बीड : शांतीवन शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहे. मे महिन्यातील ४७ डिग्री तापमानात टोमॅटोची लागवड केली. इतक्या कठीण उष्णतेच्या तडाख्यात ती झाडे वाढवली म्हणून आज दोन एकर टोमॅटोचा मळा शांतीवन मध्ये फुलला आहे. सुदैवाने आज ७० रुपये किलो टोमॅटोचा भाव असून भाव असेच टिकले, तर यातून २० लाख रुपयाचे उत्पन्न अपेक्षित आहे. असे घडले तर यावर्षी शांतीवन मधील ३०० लेकरांच्या भाकरीसाठी लागणारी गरज भरून काढण्यासाठी खूप मोठी मदत होईल, अशी माहिती दीपक नागरगोजे यांनी दिली.
श्रध्येय बाबा आमटे यांनी दिलेल्या शिकवणीनुसार शांतीवनची वाटचाल हळू हळू स्वावलंबनाकडे चालू आहे. केवळ देणगीवर संस्था उभी राहू शकत नाही. तर आपल्या कष्टातून निघणाऱ्या उत्पन्नाचा आधार मिळाला तरच सामाजीक संस्था चालू शकतात. अन्यथा ते काम फार काळ टिकणार नाही; म्हणून स्वावलंबी होणे गरजेचे आहे, असे बाबा म्हणायचे. म्हणूनच त्यांच्या या संकल्पनेतून आनंदवन ही जगातील सर्वात मोठी महारोग्यांची वसाहत स्वावलंबी बनू शकली. पुढे डॉ विकास आमटे यांनी वेगवेगळे १३० उद्योग आनंदवनात उभे केले आणि आनंदवन हे पुनर्वसन प्रकल्पाबरोबरच एक मोठे उद्योग केंद्र बनू शकले .
बाबांच्या याच विचारांचा आदर्श घेत आदरणीय डॉ विकास आमटे यांच्या मार्गदर्शनाने आणि त्यांच्या शेती आणि जलसिंचनच्या कामाची प्रेरणा घेऊन शांतीवन शेतीत वेगवेगळे प्रयोग करत आहे. जिथे दिवाळी नंतर चिमणीला पिण्यास पाणी नसायचे अश्या दुष्काळ ग्रस्त प्रदेशात शांतीवनने पाण्याचे मोठे स्रोत निर्माण केले आहेत. केवळ आपलीच नव्हे तर शेतकऱ्यांची २०० एकर जमीन बारमाही ओलिताखाली आणली आहे. सोमनाथ प्रकल्पाच्या धर्तीवर आता शेतीत वेगवेगळे प्रयोग आम्ही करत आहोत. कडाक्याच्या उन्हाळ्यातही १० एकर जागेवरती शांतीवनने टरबूज आणि खरबूजचे पीक उत्तम काढले.
टोमॅटो विक्री सुरु करत आहोत. ‘यासाठी प्रेरणा ज्यांनी डॉ विकास आमटे आणि बळ शशिकांत चितळे आणि श्री सुरेश जोशी यांनी दिले, तर वीणा गोखले यांच्या 'देणे समाजाचे ' या चळवळीने या स्वप्नांपर्यंत पोहोचवले,’ अशी भावना नागरगोजे यांनी व्यक्त केली.